गृहविभागाकडून सुरू करण्यात आलेल्या डायल ११२ वर केलेल्या तक्रारीची सोयगाव पोलीस घेईना दखल.
सोयगाव तालुक्यात अवैधधंदे बोकाळले.

सोयगाव दि. १९ (वृत्तसेवा) शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत गृहविभागाचा डायल ११२ या नंबर वर गोपनीय माहिती दिली असता कारवाई करण्यात सोयगाव पोलीस यंत्रणा टाळाटाळ करीत असल्याची चर्चा सोयगाव तालुक्यात रंगत आहे. तसेच डायल ११२ वर गोपनीय माहिती दिली असता माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवणे आवश्यक असतांना देखील माहिती देणाऱ्याचे नाव झिरो पोलीस (खाजगी ऐजंट) मार्फत गोपनीय माहिती देणाऱ्याचे नाव अवैध धंदे वाईकांना सांगित असल्याने गोपनीय माहीती देणाऱ्या व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण केल्या जात असल्याचे देखील बोलल्या जात आहे. त्यामुळे ११२ वर तक्रारी नंतर काय कारवाई करण्यात आली याची माहिती गुलदस्त्यातच राहत असल्याने यामुळे पोलिसांना सहकार्य करावे कसे हा मोठा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे. याबाबत गृहमंत्री व गृहविभागाचे सचिव यांनी दखल घेऊन संबंधित अधिकारी यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव शहरासह तालुक्यात जुगार, अवैधरित्या देशिदारू, गांजा व इतर अवैध धंद्यांनी कळस गाठला असून अवैधधंदे बंद करण्यात यावे यासाठी अनेकवेळा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायती व शिवसेनेची सत्ता असलेल्या सोयगाव नगरपंचायत च्या नगराध्यक्षासह नगरसेवक व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलीस अधिक्षक विनयकुमार राठोड यांची भेट घेऊन शहरात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी करूनही शहरातील अवैध धंदे बंद करण्यास स्थानिक व ग्रामीण पोलीस मुख्यालयाला यश आलेले नाही. शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जुगाराचे अड्डे असून यात काही राजकीय, प्रतिष्ठित नागरिक असलेल्यांचेच जुगार अड्डे आहे. यात पोलिसांनी खाजगी व्यक्ती व गृहरक्षक दलातील व्यक्ती मार्फत हप्ते वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांना सर्व माहिती असूनही आर्थिक लालचे पोटी अवैधधंदे बंद होत नसल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. अवैध धंद्यामुळे युवावर्ग व्यसनाधीन झाला असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून काहींचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अवैधधंदे बंद करण्याबाबत ग्रामीण पोलीस अधिक्षक विनयकुमार राठोड यांची दोन महीण्यापुर्वी सोयगाव येथील नगरसेवकांनी भेट घेत लेखी निवेदन दिले होते. परंतु सदर निवेदनाची दखल अद्याप पर्यंत घेतली नसल्याने पोलिस अधिक्षक यांच्या कार्य पद्धतीवर शंका निर्माण होत आहे. जनतेच्या पैशातून सुखसुविधा भोगणारे अधिकारी, मंत्री याकडे लक्ष देणार की अनेकांचे संसार उध्वस्त होतांना बघणार हे पाहणे गरजेचे असणार आहे.
११२ डायल ची अशी घेतली जाते दखल–
राज्यातील नागरिकांना एकाचवेळी सर्व प्रकारची मदत मिळावी. या उद्देशाने ११२ डायल ही योजना सुरु करण्यात आली. यामध्ये तक्रारदार व्यक्तीचा तक्रारी कॉल प्रथम नवी मुंबईतील केंद्राला जातो. तेथे तक्रारी संदर्भात संपूर्ण माहिती घेऊन तो कॉल संबंधित जिल्ह्याला पाठविला जातो. तक्रार पाहून त्यावेळी तेथून जवळ असलेल्या पोलीस मार्शलला त्याची माहिती पाठविली जाते. मार्शल कॉल्सची पूर्तता करुन त्याची माहिती दिली जाते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पार पडते. परंतु कारवाई बाबत ११२ वर तक्रार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी काय कारवाई केली याबाबत अवगत केले जात नाही त्यामुळे ११२ विषयी नागरिकांमधून अविश्वास दाखविला जात आहे.



