शासनाच्या परिपत्रकानुसार दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना बागायती दराने नुकसान भरपाई द्यावी- भाजपा जिल्हा सरचिटणीस संजीवन सोनवणे.

सोयगाव दि. ३ (वृत्तसेवा) शासनाच्या परिपत्रकानुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना बागायती दराने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी दि. २ मंगळवारी भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे यांनी सोयगाव तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, शासनाने निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार आता पर्यंत नुकसानभरपाई दिलेली नाही. आता पर्यंत मागील नुकसानीचा अहवाल पाहिल्यास सरसकट जिरायतीच्या परिपत्रका प्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान मिळालेले आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.शासनाचे बागायती चे दर हेक्टरी सव्वीस हजार रुपये आहे. परंतु शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये प्रमाणे हेक्टरी नुकसान भरपाई दिलेली आहे.तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सहानुभूती पूर्वक विचार करून जिरायती / बागायती / बहुवार्षिक पिकांच्या वर्गवारी नुसार व शासनाच्या परिपत्रकानुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ज्यांची बागायती जमीन आहे अशा शेतकऱ्यांना बागायती दराने नुकसान भरपाई देण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान तहसील कार्यालयात तहसीलदार, नायब तहसीलदार उपस्थित नसल्याने अव्वल कारकून डी. एफ. सोनवणे यांनी निवेदन स्विकारले. यावेळी बद्री राठोड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.



