सततधार पावसामुळे डेंग्यूच्या उद्रेकाची शक्यता, सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची मनपाचे आवाहन.

चंद्रपूर दि. २७ (वृत्तसेवा) काही दिवसापासून शहरात सततधार पाऊस सुरु असल्यामुळे डेंग्यूच्या उद्रेकाची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महानगरपालिकेतर्फे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.
महानगरपालिकेतर्फे प्रतिबंधात्मक योजना सुरु असल्यातरी नागरिकांना स्वतःचा संरक्षणासाठी पुढील उपाय योजना करणे आवश्यक आहे.
घराच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी पाणी साचू देऊ नये, ज्या भांड्यात तुम्ही पाळीव प्राण्यांना पाणी देता ते भांडे स्वच्छ ठेवने, पाण्याची टाकी चांगल्या प्रकारे झाकून ठेवने, कुलर आणि पाण्याच्या टाकीत आठवड्यातून एकदा थोडे पेट्रोल टाकने, तसेच रेफ्रिजरेटरच्या तळाशी असलेला पाण्याचा ट्रे दररोज रिकामे करणे आवश्यक आहे.
कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी मनपातर्फे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविली जात असुन २८ ब्रिडींग चेकर्स, ३२ ए.एन.एम. २२ एम.पी.डब्लु. १७० आशा वर्कर व स्वच्छता निरीक्षक पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. ब्रिडींग चेकर्सद्वारा अधिकाधिक घरांची दररोज तपासणी केली जात असुन प्रत्येक घरामध्ये सतर्कता बाळगण्याचे इशारा दिला जात आहे.
पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु, डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात. या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली असुन नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
डेंग्युची लक्षणे –
डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यूताप व डेंग्यू रक्तस्रावी ताप हे मुख्य आजार आहेत. ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या खोबणीमधे दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी, स्नायूमध्ये वेदना, सांधेदुखी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. वस्तुतः डेंग्यू हा सामान्य आजार आहे परंतु या रोगाबाबत माहिती नसल्याने किंवा अपुरी माहिती असल्याने काही वेळा तो जीवघेणा ठरू शकतो. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
डेंग्यु टाळण्यास उपाययोजना –
डेंग्यु डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची तपासणी करावी . पाणी साठवण्याची भांडी कोरडी करणे, डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाकणे, पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाकणे आवश्यक आहे. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी संपवितात ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो. आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा.



