जिल्ह्यात ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियान…
घरगुती स्वच्छतेला प्रोत्साहन; ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे सीईओंचे आवाहन.

चंद्रपुर दि. ०२ (प्रतिनिधी) स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा – २ अंतर्गत ‘स्वच्छ माझे अंगण’ हे महत्त्वपूर्ण अभियान चंद्रपुर जिल्ह्यात दि. १ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. हागणदारी मुक्त (ओडीएफ) मॉडेल गावे तयार करणे आणि घरगुती स्वच्छता सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. वैयक्तिक शौचालयांचा नियमित वापर, घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रभावी अंमलबजावणी हा या अभियानाचा उद्देश आहे, जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येईल, गटविकास अधिकाऱ्यांना त्यांच्या तालुक्यातील सर्व गावांचे नियोजन करून नागरिकांना सहभागी करून घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले .
अभियान कालावधीचे टप्पे : अभियान कालावधी : १ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२४, कुटुंबांना भेटी व पडताळणी कालावधी: २६ ते ३० सप्टेंबर २०२४ असा असुन, या मधिल पात्र कुटुंबांना निमंत्रण: १ ऑक्टोबर २०२४ ग्रामपंचायत कडुन देण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर २०२४ पात्र कुटुंब धारकांना प्रशस्तीपत्र देवुन सन्मानित केले जाणार आहे.अशा पद्धतीचा कालबध्द कार्यक्रम राबविण्याच्या शासनाच्या सुचना आहेत.
त्यानुसार गावस्तरावर ग्रामसेवकांच्या माध्यमातून अभियानाची माहिती ग्रामस्थांना देण्यात येणार आहे. अभियानात सहभागी झालेल्या कुटुंबांचा यशोचित सत्कार करण्यात येईल. सहभागी कुटुंबांनी घरगुती खतखडा, परसबाग, वैयक्तिक शोषखड्डा किवा पाझरखड्डा, वैयक्तिक शौचालय आणि घरगुती कचराकुंड्या ठेवणे आवश्यक आहे. अशा कुटुंबांना दि. २ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नूतन सावंत यांनी गावकऱ्यांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


