प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे निवेदन, पाचवा हप्ता तत्काळ न दिल्यास आंदोलन करण्याचा दिला इशारा…

सोयगाव दि. १० (वृत्तसेवा) सोयगाव नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा शेवटचा पन्नास हजार रुपयांचा पाचवा हप्ता गेल्या चार पाच वर्षांपासून प्रलंबित असल्याने मेटाकुटीस आलेल्या संतप्त लाभार्थ्यांनी तहसीलदार व नगरपंचायत यांच्या कडे दि. १० मंगळवारी लेखी निवेदनाद्वारे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान लाभार्थ्यांच्या गंभीर प्रश्नाकडे कुणीही लक्ष देत नसल्याने न्याय पालिकेकडून न्याय मिळवावा लागेल अशी चर्चा लाभार्थ्यांमध्ये रंगली होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव नगरपंचायतला प्रधानमंत्री आवास योजना अंमलात आली तेंव्हा पासून सण २०२४ पर्यंत शहरातील जेवढे घरकुल लाभार्थी आहेत त्या अनुषंगाने घरकुल लाभार्थींना देण्यात आलेल्या धनादेशची माहिती मिळावी. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांनी सण २०१८ – १९ पासून घराचे पूर्ण काम केले आहे. घरकुल पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांनी बँकेचे कर्ज, बचतगटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन घराचे काम पूर्ण केले आहे. चार,पाच वर्षांचा कालावधी लोटला मात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा शेवटचा पाचवा हप्ता ५००००/- ₹ अद्यापही मिळालेला नाही. अनेक वेळा नगरपंचायतला लेखी तक्रारी करून देखील मुख्याधिकारी लक्ष देत नाही. लाभार्थ्यांना घरकुलाचा पाचवा हप्ता ५००००/- पंधरा दिवसाच्या आत लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा.अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर, तहसीलदार सोयगाव व मुख्याधिकारी नगरपंचायत सोयगाव यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर ८५ घरकुल लाभार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. लाभार्थ्यांना न्याय मिळतो की संघर्ष करावा लागतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



