महाराष्ट्र

ईकेवायसी करिता वयोवृध्दांनी तहसीलच्या आवारात काढली रात्र, तहसील कार्यालयाचा अनागोंदी कारोभार…

पालकमंत्र्यांना तालुका वासीयांची आर्त हाक !

सोयगाव दि. २८ (वृत्तसेवा)  साठ किलोमीटर अंतरावरून तहसिल कार्यालयात दि. २७ गुरुवारी ईकेवायसी करण्या करिता आलेल्या दोन पुरुष, एक महिला या वयोवृद्ध लाभार्त्यांना चक्क तहसिल कार्यालयाच्या आवारात रात्र काढावी लागल्याचा धक्कादायक प्रकार दि. २८ शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी हे जणू सोयगाव तालुका हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा भाग नसल्यासारखे वागत असल्याने याची किंमत सर्वसामान्य नागरिकांना मोजावी लागत आहे. किमान पालकमंत्र्यांनी तरी सोयगावकडे लक्ष द्यावे अशी आर्त हाक नागरिकांनी केली आहे.

    याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव तहसिल कार्यालयाने बी. एस. एन. एल. चे बिल भरले नसल्याने चार पाच दिवसांपासून नेट बंद आहे त्यामुळे तहसिल कार्यालयाची कामे खोळंबली आहे. ईकेवायसी करण्या करिता ग्रामीण भागातून आलेल्या वयोवृद्ध महिला व पुरुषांना मोठा त्रास सहन करीत तहसिल कार्यालयाच्या खेट्या माराव्या लागत आहे. सावळदबारा येथून दि. २७ गुरुवारी तहसिल कार्यालयात ईकेवायसी करण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध दोन पुरुष व एका महिलेला गुरुवारी ईकेवायसी झाली नसल्याने किमान शुक्रवारी तरी ईकेवायसी होईल या आशेने रात्री तहसिल कार्यालयाच्या आवारात डासांचा मारा सोसत व तब्येतीची परवा न करता रात्र काढावी लागल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी तहसिल कार्यालयाच्या आवारात उघडकीस आल्याने नागरिकांनी तहसिल कार्यालयाच्या या अनागोंदी कारभारावर संताप व्यक्त केला आहे. दरम्यान तिघा वयोवृद्धांनी तहसिल कार्यालयाच्या आवारातील हौदात असलेल्या पाण्यानी शुक्रवारी सकाळी स्नान करून ओले कपडे तहसिल कार्यालयाच्या ताराच्या कंपाउंडवर सुकविण्यासाठी टाकले होते. तहसिल कार्यालयाने बी. एस. एन. एल. चे ३६९६२ रु. इतके बिल भरले नसल्याने नेट बंद होते. शुक्रवारी ईकेवायसी होईल या आशेवर असलेल्या वयोवृद्धांना दोन दिवस तहसिल कार्यालयात थांबून सुद्धा माघारी फिरावे लागल्याने जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यावर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी आर्त हाक तालुका वासीयांनी दिली आहे.

ईकेवायसी चे ठरलेले दर १०० ते १५० रुपये..

ईकेवायसी साठी तालुक्यातून आलेले वयोवृद्ध आजी, आजोबा, विधवा / परित्यक्ता महिला, दिव्यांग व्यक्ती दिवस दिवस थांबून सुध्दा कामे होत नाही. त्यांना आल्या पावली परत जावे लागते. ज्यांनी १०० ते १५० रुपये दिले त्यांचीच ईकेवायसी करण्यात येते जर पैसे घेत असल्याचे बाहेर सांगितले तर मानधन बंद करण्यात येईल असे धमकावले जात असल्याचे आमच्या प्रतिनिधींशी नाव न छापण्याच्या अटी वर सांगण्यात आले. तालुक्यातील वयोवृद्ध आजी, आजोबा, विधवा / परित्यक्ता महिला, दिव्यांग व्यक्तींकडून पैसे उकळले जात असून आलेल्या लाभार्थ्यांना आर्थिक, मानसिक व शारीरिक देखील त्रास सहन करवा लागत आहे.

Related Articles

Back to top button