राज्यपालांच्या विशेष ग्रामसभेच्या आदेशाला तालुक्यातील ग्रामसेवकांकडून केराची टोपली…
गटविकास अधिकारी मात्र सुस्त. कारवाई करणार कोण?

सोयगाव दि. २२ (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्यात ४६ ग्रामपंचायत असून दि. २२ डिसेंम्बर रोजी राज्यपालांच्या विशेष ग्रामसभेच्या आदेशाला तालुक्यातील बहुतांश ग्रामसेवकांनी केराची टोपली दाखवल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यात ग्रामसभेबाबत जनजागृती करण्यात आली नसल्यामुळे कोरम अभावी ग्रामपंचायतीच्या विशेष ग्राम सभा तहकूब करण्यात आल्याची चर्चा सुरू असून मात्र उपस्थिती बाबत कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने ग्रामसेवकांमधूनच विशेष ग्रामसभेबाबत उदासीनता दिसून आल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील किती ग्रामपंचायतींच्या विशेष ग्रामसभा घेण्यात आल्या याबाबत ग्रामविस्तार अधिकारी राकडे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. याच संदर्भात गटविकास अधिकारी डी. एस. अहिरे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता दोन तीन मिनिटात कळवतो असे सांगितले मात्र त्यांनीही माहिती देण्यास टाळाटाळ केली. गटविकास अधिकारी यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे कर्मचारी जुमानत नसल्याची चर्चा पंचायत समिती आवारात सुरू होती. मुख्य कार्यकारी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करतात की त्यांना पाठीशी घालतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, जल जीवन मिशन, राज्य पाणी व स्वच्छता मिशन च्या अति. अभियान संचालक सुषमा सातपुते यांनी दि. २२/१२/२०२३ रोजी स्वच्छ भारत मिशनच्या अनुषंगाने होणाऱ्या ग्रामसभे बाबत, नल जल मित्र कार्यक्रमासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या बंधित निधी मधून रक्कम रुपये ४९, ५८० /- इतका राखीव ठेवण्याबाबत ग्रामसभेची मान्यता घेणे. व हरघर जल घोषित गावांच्या बाबतीत ग्रामसभेची मान्यता घेणे. यासाठी अत्यंत महत्वाचे व तातडीचे पत्र राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांचे पत्र जा. क्र. / मविशा / ०१२० / प्र. क्र. १७५ / २०१९-२० / २१९५. दि. २०/१२/२०२३ रोजी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात आले होते. केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत हागणदारीमुक्त (ओ. डी. एफ.) चे ध्येय साध्य करण्याच्या हेतूने वैयक्तिक शौचालय व सार्वजनिक शौचालय बांधकाम इत्यादींच्या अनुषंगाने दि. ३०/१०/२०२३ ते ३१/१२/२०२३ या दरम्यान विशेष अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नियोजनानुसार राज्यातील मुख्यकार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषद यांनी त्यांचे अधिनस्त सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी / कर्मचारी यांनी दि. २२/१२/२०२३ रोजी विशेष ग्रामसभेचे अयोजनाबाबत सूचित करावे असे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शासन परिपत्रक जारी करण्यात आले असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. राज्यपालांच्या आदेशालाच तालुक्यातील ग्रामसेवकांनी केराची टोपली दाखवल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता यांच्यावर कारवाई होणार कि त्यांना पाठीशी घातले जाते.



